मुंबई : ‘भाजप महायुती सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व नोकरीत दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे अभिनंदन करत असून, मराठा समाजाने अनेक दशके दिलेल्या लढ्याचा आज ऐतिहासिक विजय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील-दानवे यांनी गुरुवारी (२७ जून) व्यक्त केली.
दानवे म्हणाले, ‘मराठा समाजातील मोठ्या वर्गाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी समाजाने दीर्घकाळ लढा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाने राज्यात लाखा-लाखांचे ऐतिहासिक मोर्चे काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने विचार केला आणि सर्व वैधानिक प्रक्रिया पार पाडून मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी व न्यायालयात ते टिकण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिसमितीने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनासाठी सातत्याने प्रयत्न केले. उच्च न्यायालयाने २७ जूनला मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरविल्यामुळे भाजप सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत व मराठा समाजाला ऐतिहासिक यश मिळाले आहे.’
‘भाजपने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास मराठा समाजाला आरक्षण देण्याचे स्पष्ट आश्वासन भाजपने दिले होते. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीनेही मराठा समाजाच्या आरक्षणाला ठराव करून पाठिंबा दिला होता,’ असे दानवे यांनी सांगितले.